Home A blog A अनेक लोक निरूद्देश जीवन जगत आहेत

अनेक लोक निरूद्देश जीवन जगत आहेत

सुबह होती है शाम होती है 
उम्र यूं ही तमाम होती है
माणसाचे अर्धे जीवन नशीबावर आधारित असते तर अर्धे शिस्तीवर. शिस्तीवर आधारित जीवन अधिक महत्त्वाचे असते, कारण त्याच्याशिवाय माणूस नशिबाने मिळालेल्या संधींचा पूरेपूर उपयोग करून घेऊ शकत नाही. जगात आज जगण्याचे दोन सर्वमान्य उद्देश आहेत. एक जीवनाचा स्तर उंचवणे, दोन मनोरंजन. या दोन्ही उद्देशांच्या प्राप्तीसाठी पैशांची गरज असते. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी अधिकाधिक खर्च करण्यासाठी प्रेरित केले जाते. तर मनोरंजनामध्ये कोट्यावधी डॉलरची अनुत्पादक गुंतवणूक केली जाते. 
जगातील बहुतेक मुस्लिम लोक पश्चिमेच्या मानसिक गुलामगिरीत जगत आहेत. त्यामुळे पश्चिमेने दिलेले जीवन जगण्याचे वर नमूद दोन्ही उद्देश्य त्यांनी नकळत स्विकारलेले आहेत व ते साध्य करण्यासाठी ते रात्रं-दिवस कष्ट करीत आहेत. वस्तूंवर प्रेम करीत आहेत तर माणसांचा उपयोग करीत आहेत. वास्तविक पाहता माणसांवर प्रेम करून वस्तूंचा उपयोग करणे अपेक्षित होते. 
पूर्वीच्या काळी जगात सर्वत्र गुलामगिरीची पद्धत रूढ होती. गुलामांची खरेदी-विक्री होत असे. त्यासाठी बाजार भरत असत. गुलाम हे शरिरानेच नव्हे तर मनाने सुद्धा गुलाम असत. अत्यंत दयनीय अवस्थेत जगावे लागत असले तरी स्वतंत्र होण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नसे. कोणी धाडस केलेच तर त्याचा अमानुष छळ करून कत्तल करण्यात येई, म्हणून गुलाम लोक स्वतंत्र होण्याची संधी मिळूनही प्रयत्न करत नसत. अपवादात्मकरित्या एखादा गुलाम कधीकाळी गुलामगिरीतून पळून जावून स्वतंत्र झालाच तर तो इतर गुलामांच्या नजरेत नायक ठरत असे व ही घटना इतर गुलामांसाठी उत्सवाची घटना मानण्यात येत असे. 
आजचे मुस्लिम सुद्धा पश्चिमेच्या मानसिक गुलामगिरीत जगत आहेत. म्हणूनच एखाद्या मुस्लिमाने पाश्चिमात्य विधीमागे एखादे उच्चस्थान पटकाविले. उदाहरणार्थ ऑस्कर किंवा नोबेलसारखे पुरस्कार मिळविले, क्रिकेट किंवा टेनिसच्या रँकिंगमध्ये उच्च मानांकन मिळविले, चित्रपटामध्ये व्यावसायिक यश मिळविले तर बाकी मुस्लिमांना आनंदाचे भरते येते. त्यांच्यात उत्साह संचारतो. शाहरूख खान, सलमान खान, ए.आर. रहमान यांच्याबद्दल मुस्लिमांच्या मनामध्ये जो अभिमान आहे तो याच मानसिकतेतून आलेला आहे. कोणीही हा विचार करीत नाही की हे नाचे समाजामध्ये अनैतिकतेला प्रोत्साहन देत आहेत. त्यांचे वर्तन इस्लामविरोधी आहे. ते आपले नायक होवूच शकत नाहीत. 
पाश्चिमातीकरण म्हणजे आधुनिकीकरण अशी आमची धारणा झालेली आहे, जी की चुकीची आहे. आज भारतीय मुस्लिमांची परिस्थिती अशी आहे की, 10 आशरा-ए-मुबश्शीरा (ते दहा भाग्यवान व्यक्ती ज्यांना अल्लाहने जीवंतपनी जन्नतची शुभवार्ता दिली होती) ची नावे एक टक्का मुस्लिमांना सुद्धा माहित नसतील. मात्र शाहरूख खान, सलमान खान सारख्यांची नावे त्यांच्या चित्रपटांच्या बारीक-सारीक तपशीलासहित बहुसंख्य मुस्लिमांना पाठ आहेत. 
जीवनमान उंचावणे गैर नाही. मात्र ते उंचावण्यासाठी, ” काही पण” करणे गैर आहे. भ्रष्ट पद्धतीने जीवनमान उंचावणे इस्लामला मान्य नाही. आज कुठले ना कुठले अनैतिक कृत्य केल्याशिवाय माणसाला गबर बनता येत नाही, हे कटू सत्य आहे. अमेरिका आणि युरोपची प्रगती जगातील गरीब देशांचे रक्त (अर्थ) शोषण करून झालेली आहे. भारतातही शहरांचा विकास ग्रामीण भागावर अन्याय करून झालेला आहे. आपल्या देशातच नव्हे तर जगात सुद्धा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समता प्रस्थापित झालेली नाही. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये ती शक्यही नाही. 
जीवनमान उंचावणे आणि मनोरंजन या प्रक्रिया सतत चालू असतात. त्यातून अनुत्पादक गोष्टींना अकारण महत्व प्राप्त होत जाते तर जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीचे महत्त्व कमी होत जाते. मुठभर लोकांच्या हाती त्यांच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त पैसा जमा होतो. तर बहुसंख्य लोकांच्या वाट्याला फार कमी पैसा येतो. यातूनच अगोदर विषमता व नंतर वर्गकलह निर्माण होतो. समाजात नेहमी असे लोक मोठ्या संख्येने असतात जे आपल्या पोषणासाठी श्रीमंतांकडे आशाळभूत नजरेने पाहत असतात. मात्र श्रीमंतांना त्यांची दया येत नाही. समाजात गरीबी कायम राहणे त्यांच्या हितासाठी आवश्यक असते. कारण त्यांच्या कारखान्यांना स्वस्तात मजूर मिळत असतात. याच मानसिकतेतून बहुसंख्यांना कायम गरीबीत ठेवण्याचे षडयंत्र रचले जाते. 
जीवन जगण्याचे खरे उद्देश्य
जीवनाचा स्तर सतत उंचवत ठेवणे व सतत मनोरंजनात व्यस्त राहणे हे मानवी जीवनाचे उद्देश्य असूच शकत नाही. ही बाब किमान साहेब-ए-शरियत (मुस्लिम) लोकांच्याही लक्षात येवू नये, यासारखे दुर्देव नाही. कुरआनने मानवजातीसाठी जगण्याचे जे उद्देश्य ठरवून दिलेले आहे ते खालीलप्रमाणे आहे. 
1. ”मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही की त्यांनी माझी भक्ती करावी” (कुरआन : सुरे अज्जजारियात आयत नं. 56).  
या आयातीवरून स्पष्ट होते की, माणसाच्या जीवनाचे उद्देश्य अल्लाहची भक्ती हेच आहे. या ठिकाणी वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणून स्पष्ट करू इच्छितो की, भक्ती या शब्दाचा अर्थ केवळ कलमा, नमाज, रोजा, जकात, हज इथपर्यंतच मर्यादित नाही तर या ठिकाणी जीवन जगण्याची अल्लाहला मान्य असलेली पद्धती अशा व्यापक अर्थाने भक्ती हा शब्द उपयोगात आणलेला आहे. जीवन जगताना अल्लाहने शरियाच्या माध्यमातून दिलेल्या आदेशांची अवहेलना होणार नाही याकडे लक्ष दिल्यास दुसऱ्यांना त्रास होत नाही व आदर्श समाजाची रचना होते. आदर्श समाजाच्या रचनेपेक्षा दूसरे कोणते महान उद्देश असूच शकत नाही. 
2. ”तुम्हा लोकांना जास्तीत जास्त आणि एकमेकापेक्षा जास्त धन प्राप्त करण्याच्या मोहाने बेसावध करून टाकले आहे. इथपावेतो की (याच चिंतेत) तुम्ही थडग्यापर्यंत पोहोचा. कदापि, नाही! लवकरच तुम्हाला कळून येईन. पुन्हा (ऐकून घ्या) कदापि नाही! लवकरच तुम्हाला कळून येईल. कदापि नाही! जर तुम्ही खात्रीचे ज्ञान म्हणून (या चालीच्या परिणामाला) जाणत असता तर (तुमचे वर्तन असे नसते). तुम्ही नरक पाहणारच. पुन्हा (ऐकून घ्या) तुम्ही अगदी खात्रीने नरक पहाल. मग नक्कीच त्या दिवशी या देणग्यां (जीवनात मिळालेल्या गोष्टीं) संबंधी तुम्हाला जाब विचारला जाईल” (सुरे अत्तकासूर : आयत नं. 1 ते 8). 
या आयातींमध्ये कुठल्याही मार्गाने जास्तीत जास्त धन प्राप्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या अनैतिक उठाठेवी संबंधी सावध करण्यात आलेले आहे. या आयातींच्या शब्दरचनेमध्ये पुन्हा-पुन्हा ही गोष्ट लोकांच्या लक्षात आणून देण्यात आलेली आहे की, तुम्ही जीवनमान उंचवण्यासाठी उलट-सुलट मार्गाने आज जरी धन गोळा करण्यामध्ये यशस्वी झालात तरी एक दिवस तुम्हाला नक्कीच त्याच्या बदल्यात नरकात जावे लागेल. इमानधारकांच्या मनाचा थरकाप उडविण्यासाठी या आयाती पुरेशा आहेत. 
3. ”ऐहिक जीवन तर एक खेळ-तमाशा आहे. वास्तविक पाहता मरणोत्तर जीवनाचे ठिकाणच त्या लोकांकरिता अधिक उत्तम आहे जे दुराचारापासून अलिप्त राहू इच्छितात. मग काय तुम्ही बुद्धीचा उपयोग करणार नाही? (सुरे अल्अनाम : आयत नं. 32).
या आयातींचा अर्थ सांगताना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ”जीवनाला जरी खेळ-तमाशा म्हणून संबोधिले आहे तरी याचा अर्थ असा बिल्कुल नाही की जीवनामध्ये कुठलेही गांभीर्य नाही आणि जीवन फक्त खेळ-तमाशासाठी बनविले गेले आहे. वास्तविक पाहता या आयातीचा अर्थ असा आहे की, आखिरत (मृत्यूनंतरच्या जीवना)च्या असीमित जीवनाच्या तुलनेत या पृथ्वीवरील जीवन असे आहे जसे एखादा व्यक्ती काही वेळा करिता मनोरंजनासाठी एखादा खेळ खेळतो आणि परत आपल्या वास्तविक जीवनामधील गंभीर गोष्टींकडे वळतो.” (तफहिमुल कुरआन खडं 1 – आयत नं.32, पान क्र. 533).  
शेवटी एवढेच सांगू इच्छितो की, मानवी जीवन अत्यंत सुंदर आहे व जबाबदारीने जगण्यासाठी देण्यात आलेले आहे. हे जीवन एकदाच मिळालेले आहे. या जीवनात आपण कसे वागतो यावरच मृत्यूनंतर आपली काय गत होईल हे अवलंबून आहे. बुद्धीमान माणसासाठी एक तर्क सादर करत आहे की, आपल्या जन्माअगोदरच्या जीवनावर आपला काहीच अधिकार नव्हता व मृत्यूनंतरच्या जीवनावरही काहीच अधिकार राहणार नाही. मग या 60-70 वर्षाच्या जीवनावरच आपल्याला अमर्याद अधिकार कसा मिळू शकतो की आपण कसेही वागलो तरी काहीही फरक पडणार नाही. क्षणभर डोळे मिटून याचा विचार केल्यास आपल्याला साक्षात्कार होईल की हे जीवन अल्लाहने दिलेल्या मार्गदर्शनाशिवाय व्यतीत केल्यास त्याचे वाईट परिणाम  मृत्यूनंतरच्या जीवनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून मृत्यूनंतरच्या असीमित जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल तर हे जीवन जबाबदारीने, काटेकोरपणे आणि नैतिक पद्धतीने जगणे आवश्यक आहे. जगण्यासाठी मार्गदर्शन अतिशय सोप्या शब्दात कुरआन आणि हदीसमध्ये उपलब्ध आहे. त्यातूनच हस्तगत केलेल्या संहितेला शरिया असे म्हणतात. नैतिक जीवन जगण्याचा एकमेव मार्ग शरिया हाच आहे. मग तो कोणाला आवडो किंवा न आवडो.
– एम.आय.शेख
9764000737
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *