कुरआन मुस्लिमांचा धर्मग्रंथ मानला जातो. वास्तविकपणे अखिल मानवजातीसाठी त्यांच्या निर्माणकर्त्या स्वामीने पाठविलेला तो संदेश आहे. ईशग्रंथापैकी ती परिपूर्ण आणि शेवटचे संकलन आहे. पवित्र कुरआननंतर कोणताही ईशग्रंथ जगात अवतरल्याचे आढळून येत नाही. हा ग्रंथ सर्व माणसांच्या मार्गदर्शनासाठी अवतरला असून जीवनाच्या प्रत्येक अंगात तो मागदर्शक आहे. जगाकडे पाहाण्याचा माणसाचा दृष्टिकोन तो स्पष्ट करतो, त्याला जीवन व्यतीत करण्याची पद्धत शिकवितो, त्याला त्याच्या कर्तव्यांचे स्मरण करून देतो, त्याला सत्कर्मांची फळे दाखवून देतो व दुष्कर्मांच्या वाईट परिणामांची भयसूचना देतो.
प्रेषित मुहम्मद(स.) यांच्यावर हा ग्रंथ जसा अवतरला होता, अक्षरशः त्याच अवस्थेत आजही तो आमच्यापाशी उपलब्ध आहे. इस्लामच्या पहिल्या शताब्दीपासून ते आजपर्यंतच्या कुरआनच्या हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत. या प्रती एकमेकांना प्रमाणित करतात आणि पुष्टी देतात. कुरआन हे जगातील पहिले असे पुस्तक आहे, ज्याला प्रत्येक कालखंडात, जगातील लाखो माणसांनी मुखोद्गत केले आहे. संपूर्ण कुरआन मुखोद्गत करणार्याला ‘हाफीज’ असे म्हटले जाते. रमजान महिन्यात दररोज रात्री संपूर्ण कुरआनचे पठन केले जाते. अशा प्रकारे सबंध जगातील लाखो मस्जिदींमध्ये संपूर्ण कुरआनचे पुनःर्पठण केले जाते.
या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. एकाच वेळी तो संपूर्णपणे लिहून मुहम्मद(स.) यांच्याकडे देण्यात आला नव्हता. प्रेषितपद प्राप्त झाल्यानंतरच्या त्यांच्या २३ वर्षांच्या जीवनकाळात तो टप्प्याटप्प्याने अवतरित होत राहिला. कुरआनच्या अवतरणाची या शृंखलेचा, मुहम्मद(स.) यांच्याद्वारा इस्लाम धर्माच्या स्थापनेशी थेट संबंध होता.
प्रेषित मुहम्मद (स.)
पवित्र कुरआन जसा मुस्लिमांचा धर्मग्रंथ समजला जातो. त्याचबरोबर मुहम्मद(स.) यांनाही मुस्लिमांचे प्रेषित मानले जाते. वास्तवतः ही गोष्ट खरी नाही. अल्लाहने मुहम्मद(स.) यांना अखिल मानवजातीसाठी आपला प्रेषित बनवून धाडले होते.
जगात आजवर होऊन गेलेल्या धर्मगुरूंपैकी प्रेषित मुहम्मद(स.) यांचे जीवनचरित्र सर्वांहून अधिक तपशिलासह आणि विश्वसनीय स्वरूपात उपलब्ध आहे. त्यात त्यांचे जीवन व त्यांची शिकवण या दोहोंचा समावेश आहे. प्रेषित मुहम्मद(स.) यांचा जन्म कालौघाच्या अशा वळणावर झाला, जेव्हा संस्कृतीचा प्रकाश पसरला होता आणि मानवजात आधुनिक युगात प्रवेश करीत होती.
प्रेषित मुहम्मद(स.) यांचा जन्म मक्केत झाला. त्या काळी मक्का एक छोटे शहर होते. त्यांचा जन्म झाला, तेव्हा परिस्थिती अत्यंत विपरित होती. जन्मापूर्वीच त्यांच्या पित्याचे निधन झाले. मातेची मायाही त्यांना अधिक काळ मिळू शकली नाही. एखादा थोरला भाऊही नव्हता, त्यांचे चुलते अबू तालीब यांचा थोडासा आधार होता. आर्थिक स्थितीही हलाखीची होती. यासाठी त्यांना शेळ्या चारावयास नेण्याचे आणि दुसर्या लोकांचा व्यापारी माल विक्रीसाठी नेण्याचे काम करावे लागले. त्यांचे मोठे धन, त्यांच्या नैतिक चारित्र्यात होते, ज्याचा सुगंध मक्केतील सर्व लोकांना जाणवत होता. विश्वासू व प्रामाणिक म्हणून त्यांना ओळखले जाई. आपल्या मौल्यवान वस्तू त्यांच्यापाशी ठेवून सुरक्षिततेचा निःश्वास सोडीत असत. लोक त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकत, त्यांचा शब्द मानीत असत. एखादे भांडण झाले आणि ते मिटण्याचे लक्षण दिसले नाही, तर लोक त्यांना पंच म्हणून निवड करीत व त्यांनी दिलेला निर्णय स्वीकार करीत असत.
त्यांचे वय चाळीस वर्षांचे झाले तेव्हा अल्लाहने त्यांना आपला प्रेषित म्हणून घोषित केले. आणि त्यांच्याकडे पवित्र कुरआनचे अंश येऊ लागले. अल्लाहचा संदेश घेऊन ते लोकांपाशी गेले. त्यांना सांगितले की केवळ एकमेव अल्लाहचीच उपासना करा आणि मूर्तिपूजा सोडा. लोकांना सांगितले की खरे बोला, न्यायाने वागा, कोणाचीही संपत्ती हडप करू नका, सर्व माणसे एकाच माता-पित्याची संतती आहेत. त्यांच्यात कसलाही भेदभाव करू नका. या गोष्टी ऐकून मक्केचे लोक बिथरले, किबहुना ते प्रेषितांचे शत्रू बनले. त्यांचा छळ केला गेला. त्यांना ठार मारण्याचा कट शिजवला गेला. तेव्हा प्रेषितांनी मक्का शहर सोडण्याचे ठरविले. मदिन्याच्या लोकांनी त्यांना साथ देण्याची शपथ घेतली व आपल्या शहरात त्यांना जागा दिली. काही दिवसांतच तेथे एक आदर्श इस्लामी समाज स्थापन झाला. मक्केचे लोक तेथेही लढाई करायला आले, पण पराजित होऊन परतले. शेवटी मुहम्मद(स.) व त्यांच्या सोबत्यांची सत्ता मक्केवरही प्रस्थापित झाली. मुहम्मद(स.) यांच्या नंतरही इस्लामी राज्याचा विस्तार होत राहिला. राज्यच नव्हे, तर त्यांच्या शिकवणींचा व पवित्र कुरआनचा प्रसार सर्वदूरपर्यंत झाला.
[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]
कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.)
संबंधित पोस्ट[xcalendar]





0 Comments