आपले जे बंधु राजकीय सत्तेच्या खुर्चीवर विराजमान आहेत, त्यांनी चांगले समजून घ्यायला हवे की ते या देशाचे मालक नाहीत. त्या खुर्चीवर निरंतर बसून राहण्याचा त्यांनी ठेका घेतलेला नाही. ते ईश्वराला या देशाचा स्वामी मानत असोत अथवा जनतेला स्वामी मानत असोत, एक दिवस त्यांना ही खुर्ची सोडावी लागणार आहे. त्या खुर्चीचे कर्तव्य त्यांनी कितपत पार पाडले, या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. ईश्वराला जर ते देशाचा स्वामी मानतात व स्वतःला त्याचा प्रतिनिधी, त्याच्याबद्दलच्या सर्व उत्तरदायित्वाची नीट जाणीव ठेऊन त्याच्या इच्छेनुसार कार्य केले, तर ती वास्तवतेची स्वीकार ठरेल. तुमचे जीवन एक जबाबदार जीवन ठरेल आणि तुमचा सर्व व्यवहार संतुलित असेल. सत्तेच्या त्या मदापासून तुम्ही पूर्णतः अलिप्त असाल, जी भल्याभल्यावर आपला अंमल चढवून त्यांना मदांध व बेहोश करुन सोडते. तुम्ही जनतेला जर, देशाचे स्वामी मानत असतात, तर तुम्ही जनतेचे प्रतिनिधी या नात्याने काम केले पाहिजे. कसल्या दुष्कृत्याला जनतेने कधी क्षमा दाखविली नाही. तुमच्या प्रत्येक कृतीवर इतिहासकारांची नजर आहे. सद्यस्थितीत दोन्ही गोष्टी तुमच्या आखत्यारीत आहेत. तुम्ही असे कार्यही करु शकता की त्यासाठी अनेक पिढ्या तुमच्या कृत्यांवर अभिमान बाळगतील, इतिहासकार आदरपूर्वक तुमचे नाव उच्चारील. तसेच तुम्ही अशी कृतीही करु शकता, ज्यामुळे तुमच्या नावावर भावी पिढ्या थुंकतील व इतिहासतज्ज्ञ आपल्या कृत्यांना ‘काळी कृत्ये’ म्हणून संबोधतील नीट ध्यानात ठेवा. सत्तेच्या खुर्चीवर असताना तुम्हाला स्वतःची जी छबी दिसते, ती तुमच्या प्रतिमेचे खरे चित्र नव्हे. तुमची खरी प्रतिमा उद्या इतिहासकाराच्या लेखणीतून उतरेल.सत्ता मिळविण्याच्या लालसेने झपाटलेल्या आणि त्यासाठी न्याय, अन्याय, उचित, अनुचित या बाबी धाब्यावर बसवून आटापिटा करणार्यांनीही ही गोष्ट चांगली लक्षात ठेवावी.
मुसलमान, देशाची आवश्यकता ठरु शकतात
या समयी भारत देश सैध्दान्तिक व व्यावहारिक गदारोळाच्या वावटळीत आहे. अशी अवस्था कोणत्याही देशात, एक निश्चित दिशा घेण्याआधी होत असते. एका बाजूला युरोपचे भौतिकवादी विचार व दृष्टिकोन आहेत, जे या देशावर लादले जात आहेत आणि याच विचारांवर आधारित व्यावहारिक पध्दती बनल्या आहेत. राजकीय सत्तेच्या बळावर या देशाला त्यांच्या मुशीत ओतले जात आहे. दुसर्या बाजूला देशाची प्राचीन, धार्मिक व नैतिक प्रकृती आहे. या प्रकृतीचे जठर अद्याप नास्तिकवादाची व भौतिकवादाची माशी पचवू शकण्यास पूर्णतः तयार नाही. नंतर धार्मिक स्वभाव असलेल्या जाती, काही कारणास्तव देशासमोर अशी गोष्ट माडण्यात असफल ठरल्या आहेत. ज्याची आवश्यकताही आहे आणि मागणीही आहे. त्या गोष्टीच्या आधारावर एखादी अशी व्यवस्था स्थापित व्हावी, जिच्यामुळे लोकांची भौतिक भूकही भागावी आणि त्यांची नैतिक व आध्यात्मिक तहानही शमली जावी. या गोष्टींच्या अभावाने देशात असंख्य गुंतागुंतीच्या समस्या निर्माण करुन सोडल्या आहेत आणि संपूर्ण देश भांबावलेल्या अवस्थेत उभा आहे.
या संधीत पुढे सरसावून ती उणीव भरुन काढणे मुसलमानांचे काम होते, कारण त्यांच्यापाशी ती गोष्ट आहे, जिची देशाला आणि देशबांधवांना अत्यंत आवश्यकता आहे. पण दुःखाची बाब अशी की देशातील गुंतागुंततीच्या समस्या सोडविणारे होण्याऐवजी, मुसलमान स्वतःच एक समस्या बनून राहिले आहेत. मुसलमानांनी आपले कर्तव्य पार पाडण्याचे सोडून दिले आणि सारा भारत देश काटेरी झुडुपांनी व्यापून गेला आणि सर्वाधिक काटेरी भाग खुद्द त्यांच्या वाट्याला आला आहे.
मुसलमानांच्या वर्तमान स्थितीचे विवेचन करताना एका विचारवंताने त्यांना अगदी सत्य असे सांगितले आहे की ‘तुमचा वर्तमानकाळ वा तुमचा भविष्यकाळ या प्रश्नावर अवलंबून आहे की ईश्वराच्या प्रेषिताकरवी, तुम्हापर्यंत पोचलेल्या ईशमार्गदर्शनाशी तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवहार करीत आहात, ज्या मार्गदर्शनासाठीच तुम्हाला मुसलमान म्हटले जाते? त्या मार्गदर्शनाचे जर तुम्ही अचूक अनुसरण केले आणि तुमच्या सामूहिक जीवनात जर संपूर्ण इस्लामचे प्रतिबिब उमटू लागले, तर तुम्ही जगात विजय प्राप्त कराल, तसेच परलोकात सफलता मिळवाल. भय, अनादर, पराजय व पारतंत्राचे जे काळे ढग तुमच्या डोक्यावर गोळा झाले आहेत ते बघता बघता निघून जातील. तुमच्याकडून न्यायाची आशा केली जाईल, तुमच्या सत्यप्रियतेवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास टाकला जाईल. तुमचे कथन सत्याचे प्रमाण मानले जाईल. तो काळ आठवण म्हणून इतिहासात एखाद्या कथा-कहाणीच्या स्वरुपात राहील की इस्लामसारख्या विश्वविजयी शक्तीचे अनुयायी कधी काळी इतके मूर्ख बनले होते की ‘मुसा’ (अलै) ची काठी (असा) त्यांच्या हातात असताना ते जादुगारांच्या काठ्यांना आणि दोरांना पाहून भयाने थरथर कापत होते.
उपद्रवातून कल्याण
मुसलमानांच्या सर्व समस्यांचे वास्तविक निराकरण यात आहे. त्यांच्या तात्कालिक आणि प्रासंगिक समस्यांचे तसेच निरंतरच्या जातीयवादाच्या समस्यांचेही हेच निराकरण आहे. निःसंशयपणे देशाच्या समस्यांचा तोडगाही हाच आहे. त्यांच्यावर जी निरनिराळी संकटे येऊन कोसळत आहेत, ती एकीकडे त्यांनी आपले वास्तविक कर्तव्य विसरुन टाकले, या निष्क्रियतेची ती शिक्षा आहे आणि दुसरीकडे त्यांना खडबडून जागृत केले जात आहे. आता तरी सावरून सावध व्हा आणि आपले कर्तव्य पार पाडा नाही तर तुम्हाकडे दुर्लक्ष केले जाईल.
लोकसमूहात जिवंतपणा व चेतना असेल, तर असे हादरे त्यांना जागे करुन सोडतात. अशा दुर्घटनातून लाभ घेण्याची त्यांच्यात क्षमता जर असेल, तर ते जागे होऊन, याच दुर्घटनांना उन्नतीची पायरी (शिडी) करुन टाकतात. भडकणारा अग्नी वार्याच्या झोताने जास्त भडकतो, परंतु मिणमिण जळणारा दीप त्याच वार्याने विझुन जातो. आता तुम्ही भडकणारा अग्नी व्हायचे की मिणमिणणारा व विझणारा दीप व्हायचे हा तुमच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. या उपद्रवामुळे कल्याणाची उत्पत्ती होऊ लागली आहे आणि त्यासाठी ईश्वराचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. आता मुसलमान लोक वस्तुस्थितीवर गंभीरपणे विचार-चितन करु लागले आहेत. तिच्या गांभीर्याची जाणीव त्यांना झाली आहे आणि झोपेतही ते काही बरळू लागले आहेत.
एका पाठोपाठ एक असे धक्के बसल्याने त्यांचे डोळे उघडले आहेत. ते आपल्या वास्तविक कर्तव्यापासून दूर भरकटले आहेत, ही जाणीवही त्यांच्यात जागृत होऊ लागली आहे. संपूर्ण संघटन करण्याच्या आवश्यकतेची जाणीवही त्यांच्यात उत्पन्न होऊ लागली आहे. त्यांच्या मनात आपल्या अन्न-वस्त्राच्या विवंचनेच्या पुढे जाऊन काही तरी करायला हवे, हा विचारही कधी शिवला नाही, त्यांनाही संघटनेच्या आवश्यकतेची जाणीव होऊ लागली आहे. त्यांच्यात अनेक अशी माणसे आहेत की एका हाकेवर ओ देण्याची कळकळ त्यांच्या अंतःकरणात आहे, त्यांच्या स्वभावाशी जुळणारी हाक त्यांच्या कानी पडत नाही. आता ‘मुस्लिम समुदाया’च्या ज्येष्ठ व्यक्तींचे हे कर्तव्य आहे की अशा नाजुक प्रसंगी त्यांनी ‘मिल्लत’ला उचित मार्गदर्शन करावे आणि वाईटातून चांगले निघण्याचा जो पैलू समोर येत आहे, उम्मतमध्ये एक प्रकारची तहान निर्माण झाली आहे, तिच्या तृप्तीची तरतूद करावी. देशव्यापी पातळीवर मुस्लिमांना असा कार्यक्रम द्यावा की ते पालापाचोळ्याप्रमाणे उडवून दिले जावू नयेत. त्यांना जीवनशक्तीही प्राप्त व्हावी आणि त्यांनी देशासाठी उपयोगी सिध्द व्हावे.
तात्कालिक व स्थानीय उपाय
वर वर्णन केलेले कार्य, हेच खरे कार्य आहे, परंतु तात्कालिक व स्थानिक पातळीवर करण्याची काही कामे अशी आहेत, ज्यावर सहानुभूती बाळगणार्या लोकांनी लक्ष ठेवायला हवे.
-
दंगलग्रस्त क्षेत्रात साधारणतः भीतीचे व हालअपेष्टांचे वातावरण बनते आणि भल्याभल्या माणसांची मती कुंठित बनते. त्याचप्रमाणे काही अतिउत्साही माणसे भावनेच्या भरात एखादे अनुचित कृत्य करुन टाकतात. या दोन्ही गोष्टींपासून धोका संभवतो अशी अवस्था दूर करण्याचे ठोस प्रयत्न व्हायला पाहिजेत. या बाबतीत मूळ गोष्ट तर ईश्वरावर भरवसा असला पाहिजे, परंतु त्याचबरोबर अन्य काही गोष्टीही या प्रयत्नात सहाय्यभूत ठरतात. उदाहरणार्थ, ऐकण्यात आलेल्या प्रत्येक अफवेवर विचार केल्याविना विश्वास केला जाऊ नये, आपल्या चुकांवरही लक्ष ठेवणे, विरोधी पक्षाच्या भूमिकेतून दंगलीसंबंधी विचार करणे, चित्राच्या दोन्ही बाजू पाहणे, कृती करणारे हात मूळ नसून, कृती करायला लावणारी मस्तके, मूळ आहे. हे दृष्टीसमोर ठेवायला हवे. अशा प्रकारच्या गोष्टी दृष्टीसमोर ठेवल्याने मानसिक समतोल राहातो आणि समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्यास मदत होते.
-
विरोधी पक्षाकडे स्वतः होऊन मैत्रीचा हात पुढे करणे फार कठीण काम आहे. एखादा माणूस हातात लाठी घेऊन तुमच्या अंगावर धावून येतो तेव्हा तुम्ही त्याला प्रेमाने आलिगन देण्यासाठी समोर जाणे ही मोठ्या शौर्याची गोष्ट आहे. सत्य असे आहे की त्यापेक्षा अधिक परिणामकारक तलवार अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही. असे करण्याचे साहस असेल तर ‘खोडसाळपणात स्पर्धा’ करण्याऐवजी ‘सज्जनपणात स्पर्धा’ करण्याचा आरंभ होऊ शकतो. तथापि ही गोष्ट नीट लक्षात ठेवावी की बरोबरीच्या दर्जाने मैत्रीचा हात पुढे करणे आणि निराशेने शरणागत होणे, यात मोठा फरक आहे. आपले अस्तित्व दुसर्याच्या अधीन करणे, यात सज्जनपणाही नाही किवा औदार्यही नाही.
-
आपसात सहानुभूतीची व सहाय्य करण्याची भावना वाढविणे, दान करण्यास सदैव तत्पर राहाणे, कोणत्याही आधारशिवाय स्वतःच्या पायावर उभे राहाण्याचा दृढ संकल्प करणे, हे आपले कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे अधिकांश वाईट गोष्टींचे जे मूळ आहे, ती स्वार्थपरायणता, हट्टीपणा व दुही आणि फाटाफूट दूर करणे आपले अनिवार्य कर्तव्य ठरते. संघटन व नेतृत्वाचे केंद्र नसल्याची केवळ जाणीव व त्याबद्दल केवळ गार्हाणी करुन अगर तसे केंद्रस्थान स्थापण्याची केवळ अभिलाषा बाळगणे पुरेसे नाही. यासाठी प्रांजळपणे प्रयत्न आवश्यक आहे, हे मनावर चांगल्या रीतीने बिबविले पाहिजे. कोणतेही नेतृत्व आकाशातून पडत नाही. आपल्यातूनच ते उदयाला येईल. त्यासाठी उच्छृंखलपणा सोडून, स्वतःला संघटनेच्या चौकटीत बांधून घेण्याची तयारी ठेवायला हवी.
-
वरील उद्दिष्टांची पूर्तता होण्यासाठी प्रत्येक मोहल्ल्यात समिती स्थापन होणे आवश्यक आहे. या समितीकडे ‘जकात’ व ‘दान’ यांची सामूहिक रीतीने वसुली करण्याची जबाबदारीही सोपविली जावी. ‘बैतुल-माल’ची स्थापना केली जावी. आपल्या कार्यक्षेत्रात शांतता व सलोखा राहील व अशांतता व उपद्रव दाबला जाईल, असे जनमत त्यांनी निर्माण करावे. अशा चांगल्या उद्दिष्टांसाठी तयार करणे आणि त्यांनाही सहकार्य देणे गरजेचे आहे. या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हंगामी परिस्थितीत ज्या शांतीसमित्या स्थापन केल्या जातात, त्यात अधिकांश माणसे तीच असतात ज्यांनी दंगलखोरांची पाठराखण केलेली असते. या समित्यांना एखाद्या राजकीय पक्षाच्या निवडणूक प्रचाराचे साधन केले जाते.म्हणून अशा शांति-समित्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी साधरणतः काहीच सहाय्यकारक ठरत नाहीत. अशा समित्यांमध्ये त्याच लोकांना घेतले पाहिजे जे फार प्रख्यात नसू देत, परंतु स्वहित व पक्षहितापासून वर येऊन केवळ सेवाभावाने व निखालस ईशसेवेच्या भावनेने कार्य करण्याचे त्यांच्यात धैर्य असावे. ही गोष्ट तेव्हाच शक्य होईल, जेव्हा भल्याबुर्याची पारख करणारी नीर-क्षीर वृत्तीची ओळख आम जनतेला होईल.
-
मदत कार्य नियमितपणे केले जावे अथवा सहानुभूती बाळगणार्या स्वयंसेवी लोकांनी ते कार्य करावे. दंगलपीडितांमध्ये आपल्या जातीचे कोण आहेत आणि दुसर्या जातीचे कोण आहेत, या हीन भावनेने हे सेवाभावी कार्य कधीही गलिच्छ करु नये. ज्या कोणावरही जुलूम-अत्याचार झालेला आहे. तो सच्चा मनाच्या व निःपक्षपाती माणसाच्या सहानुभूतीस व मदतीस पात्र आहे. त्याचप्रमाणे धर्म व जातीचा विचार न करता, अत्याचार करणारांनाही मदत केली जावी त्यांची मदत अशी करायची की त्यांना अत्याचार करण्यापासून रोखण्याचे ठोस प्रयत्न करायला हवेत.
-
साधारणतः दंगलींचा शेवट, पोलिसांनी खटले भरल्यावर होतो. ते टाळणे तर शक्य नाही. सर्वसाधारण पोलीस प्रकरणात ज्या मार्गाचा अवलंब केला जात असतो, ते जातीय दंगलीसंबंधी खटल्यात कदापि वापरले जाऊ नयेत. खोटे बोलणे, बनावट साक्षीदार हजर करणे, अथवा आपल्या चुकांवर पांघरुण घालण्यापेक्षा, खरे बोलून शिक्षा भोगणे हजारपटीने चांगले आहे. ज्या माणसात सत्यावर ठामपणे राहण्याची शक्ती असते, तेच मैदान मारु शकतात. काही ताजी उदाहरणे अशी आढळून आली आहेत की काही धैर्यवान माणसांनी सत्य व निःपक्षपाती जबाब देऊन न्यायालयालाही आर्श्चचकित केले आणि विरुध्द पक्षाच्या लोकांच्या माना खाली गेल्या.
हे काही विचार आहेत, ज्यावर सर्वांनी विचार करावा असे आम्हाला वाटते. सामान्य परिस्थितीतही ते विचार करण्यायोग्य आहेत आणि दंगलीच्या तणावग्रस्त अवस्थेत तर ते कार्यान्वित करणे अत्यंत निकडीचे आहे. सामान्य परिस्थितीतच ते कार्यान्वित करण्याचा प्रबंध केला गेला, तर (ईश्वरी इच्छा असल्यास) तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची वेळच येणार नाही. निष्कर्ष अनेक असू शकतात, परंतु सत्य असे आहे की मूळ गोष्ट हे निष्कर्ष नव्हे, हे सोनेरी सिध्दान्त नव्हेत अगर कार्यक्रमही नव्हेत. तर मूळ गोष्ट आहे अंतःकरणाची ओढ, ईमानची तळमळ, सेवाभावना व सत्यावर दृढपणे राहाण्याचे धैर्य. ईश्वरी कृपेने आपल्या समाजात या गुणांची उणीव नाही. उणीव आहे ती केवळ संघटित होऊन कार्याला वाहून घेण्याची!
0 Comments