Home A प्रेषित A प्रेषित मुहम्मद (स.) यांचा ‘तायफ’चा प्रचार दौरा

प्रेषित मुहम्मद (स.) यांचा ‘तायफ’चा प्रचार दौरा

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे एकेदिवशी भल्या पहाटेच घरून निघाले आणि सुख व शांतीचा ईश्वरी संदेश देण्यासाठी गल्लोगल्ली फिरले. पूर्ण दिवस पायपीट करूनही एकही व्यक्ती प्रेषितांचा संदेश स्वीकारण्यास तयार झाला नाही. प्रेषित दिसताच त्यांच्याशी गुंडगिरी करणे व टवाळखोरी करणे, अशी योजनाच विरोधकांनी तयार केली होती. ज्यांच्या कल्याण व भलाईसाठी प्रेषित अहोरात्र झटत होते, तेच लोक स्वतःच्या कल्याणापासून दूर पळत होते. प्रेषित मुहम्मद(स) सायंकाळी खूप व्यथित झाले.
दुसर्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास मक्का शहराची जमीनच आता नापीक होत होती. चांगले व सज्जन लोक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याभोवती गोळा झाले होते आणि सज्जनता व शृजनशीलतेचा अभाव असणारेच तेवढे प्रेषितांचा विरोध करीत होते. ही दुःखद स्थिती पाहूनच कदाचित प्रेषितांनी मक्का शहराच्या बाहेर इतर मानवांना सत्य संदेश देण्याचा कार्यक्रम आखला. यासाठी ते माननीय जैद बिन हारिसा(र) यांना घेऊन ‘तायफ’ शहराकडे रवाना झाले.
हा खडतर प्रवास त्यांनी पायीच केला. रस्त्यात ज्या वस्त्या होत्या, तेथील लोकांना त्यांनी ईश्वरी धर्माचा संदेश दिला. हा प्रवास पूर्णतः एक महिन्याचा होता.
‘तायफ’चा भूप्रदेश खूप सुपीक आणि वैभवसंपन्न असल्याने तेथील लोकांना ईश्वराचा विसर पडलेला होता. चारित्र्य आणि नैतिकतेची बंधने झुगारुन ते स्वैर जीवन जगत होते. शिवाय व्याजखोरीमुळे तेथील लोकांच्या मानवी भावनांमध्ये खूप मरगळ आलेली होती.
‘तायफ’ शहरी पोहोचून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘सकीफ’ कबिल्याच्या प्रमुखांची अर्थात ‘अब्दे या लैल’, ‘मसऊद’ आणि ‘हबीब’ यांची भेट घेतली. प्रेषितांनी अतिशय कौशल्यपूर्ण आणि प्रभावपूर्ण सत्यधर्माचा संदेश देऊन समर्थन मागितले. परंतु ते तिन्हीही सरदार विपरित बुद्धीचे निघाले. प्रेषितांना एकाने उत्तर दिले की, ‘‘जर ईश्वरानेच खरोखर आपणास प्रेषित म्हणून पाठविले असेल तर तो काबागृहावरील ‘गिलाफ’चे तुकडेतुकडे करू इच्छितो.’’ (अर्थात ईश्वराने मूर्खपणाचाच निर्णय घेतला.)
दुसरा उत्तरला,
‘‘अरे तर ईश्वराला तुमच्यापेक्षा जास्त योग्य दुसरा कोणी प्रेषित बनविण्यासाठी मिळाला नाही काय?’’आणि तिसर्याने उत्तर दिले,
‘‘मी तर तुमच्याशी काहीच बोलू इच्छित नाही. कारण तुम्ही जर खरोखरच ईश्वराचे धाडलेले प्रेषित असाल तर तुमच्याशी बोलणे म्हणजे प्रेषिताचा अपमान ठरेल. जर तुमचे बोलणे खोटे असेल तर तुमच्याशी बोलणेच उचित ठरणार नाही.’’ या तिन्ही सरदारांची नकारार्थी उत्तरे प्रेषित मुहम्मद(स) यांच्या काळजात जणू विषारी बाणांसारखी उतरली. परंतु ते संयमाचे पर्वत होते. त्यांनी मोठ्या धैर्याने म्हटले,
‘‘बरे ठीक आहे! तुम्ही या गोष्टी स्वतःपर्यंतच सीमित ठेवा. इतरांत सांगू नका!’’ परंतु या तिन्ही सरदारांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या विनंतीकडे कानाडोळा करून शहरातील टवाळ मुलांना, नोकरांना व गुलामांना प्रेषितांच्या मागे त्यांना शहराबाहेर काढण्यासाठी लावले. टवाळांचे टोळके प्रेषितांमागे लागले. त्यांच्यावर दगडांचा वर्षाव झाला, प्रेषितांचा रक्तस्त्राव झाला. प्रेषितांच्या पायांतील वाहना रक्ताने माखल्या, रखरखत्या उन्हात रक्तबंबाळ करून त्यांना शहराच्या बाहेर काढण्यात आले. खूप रक्तस्त्राव झाल्याने त्यांना प्रचंड थकवा आला. अरब प्रदेशाच्या वाळवंटी वातावरणातील उष्णतेने त्यांना प्रचंड तहान लागली. सोबत असलेल्या माननीय जैद(र) यांनी त्यांचे रक्त साफ केले. ते दोघे शहराबाहेर आले आणि एका बागेत प्रेषितांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. शरीरातून रक्त आणि डोळ्यांतून अश्रू अजूनही थांबायचे नाव घेत नव्हते. परंतु अतिदयाळू प्रेषितांनी या झाडाखाली दम घेऊन प्रार्थना केली, ‘‘हे ईश्वरा! आपल्या अशक्तपणाची आणि विवशतेची फिर्याद केवळ तुझ्यासमोरच करतो. तूच माझा स्वामी आहेस. तू जर माझ्याशी प्रसन्न असला तर मला विरोधकांची मुळीच चिता नाही. मी केवळ तुझ्याच आश्रयाची याचना करतो. तुझ्याच कांतीमय मार्गदर्शनाची आशा बाळगतो की, ज्यामुळे अन्याय, अत्याचार आणि मार्गभ्रष्टतचे सर्व काळेकुट्ट अंधार हे सतमार्गात परिवर्तीत होतात आणि विश्वाच्या सर्व समस्यांचे निराकरण होते. तुझ्याशिवाय ही शक्ती व सामर्थ्य इतर कोणातच नाही.’’
बागेच्या मालकांनी आपल्या ‘अद्दास’ नावाच्या नोकराकरवी द्राक्षांची थाळी प्रेषितांना पाठविली. प्रेषितांनी स्वीकार केला. प्रेषितांनी ईश्वराचे नाव घेऊन द्राक्षे खाण्यासाठी हात पुढे केला. ईश्वराचे नाव कानी पडताच ‘अद्दास’ विस्मयचकित झाला, कारण खाण्यास सुरुवात करताना ईश्वराचे नामस्मरण करणे हे प्रेषितत्वाचेच गुणधर्म आहेत, हे त्यास चांगले ठाऊक होते. त्याने मोठ्या आस्थेने प्रेषित मुहम्मद(स) यांची सेवा केली. हा ‘अद्दास’ नावाचा नोकर मालकांकडे परत आला तेव्हा मालकांनी त्याची कानउघाडणी करून दम दिला की, मुहम्मद(स) यांच्या शब्दांत येऊन त्यांचा धर्म स्वीकारु नकोस! परंतु अद्दासने मालकांना उत्तर दिले की, ‘‘त्यांच्यापेक्षा कल्याणकारी मानव या जगात कोणीच नाही. कारण त्यांनी मला अशी गोष्ट सांगितली जी केवळ प्रेषितच सांगू शकतो.’’
थोडी विश्रांती झाल्यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना जैद(र) यांनी आपल्या खांद्यावर घेऊन ‘कर्नुस्सअलिब’ या ठिकाणी आणले. प्रेषितांचे रक्त धुतले. प्रेषितांनी या ठिकाणी विश्रांती घेतली. माननीय जैद(र) यांना प्रेषितांची ही अवस्था पाहून खूप दुःख होत होते. त्यांनी प्रेषितांना म्हटले की, ‘‘या ‘तायफ’वाल्यांना श्राप द्यावा.’’ परंतु अतिदयाळू प्रेषित म्हणाले,
‘‘मुळीच नाही, मला ईश्वराने मानवांसाठी दयाभावनांचा आदेश दिला. मी त्यांना श्राप कसा काय देईन? या लोकांनी जरी इस्लाम स्वीकारला नाही तर भविष्यात यांची संतती निश्चितच इस्लामचा स्वीकार करील.’’
प्रेषित मुहम्मद(स) आणि माननीय जैद(र) तेथून ‘नखला’ या ठिकाणी काही दिवस राहिले. मग ‘मुतईम बिन अदी’च्या समर्थनामुळे प्रेषित काबागृहात परतले. त्यांनी काबागृहात प्रथम नमाज अदा केली आणि मग घरी परतले.
‘तायफ’च्या प्रचारदौर्यामध्ये आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर जे अत्याचार करण्यात आले त्यांना काही मोजक्या शब्दांत आम्ही वर्णन केले आहे. त्या अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी व वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी खरे तर शब्द अपुरे पडतात. ‘तायफ’ येथील सरदारांकडून झालेल्या अमानवी व्यवहाराचे प्रेषितांच्या शरीरावर आणि मनावर पडलेले घाव जाणून घेण्यासाठी एका मानवी भावनांनी भरलेल्या अंतःकरणाचीच गरज आहे.
एकदा प्रेषितपत्नी मा. आयशा(र) यांनी प्रेषितांना विचारले,
‘‘हे प्रेषिता! तुमच्यावर ‘उहुद’च्या युद्धाच्या दिवसांपेक्षाही जास्त कष्टदायक घटना कोणती घडली?’’ आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले,
‘‘हे आयशा! तुमच्या परिवारजणांकडून जो त्रास झाला, तो तर झालाच. परंतु त्याहीपेक्षा माझ्यावर जी कष्टदायक घटना घडली ती तायफ येथील प्रचारदौर्याच्या प्रसंगी घडली. तो दिवस माझ्यावर अतिशय कठीण होता की, ज्या दिवशी मी ‘तायफ’च्या सरदारांना सत्यधर्माचे निमंत्रण देत होतो आणि त्यांनी हे निमंत्रण झुगारुन लावले होते. त्याचे दुःख मला अनावर झाले होते.
‘तायफ’ वरून परत आल्यावरसुद्धा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी धीर सोडलेला नव्हता. त्यांनी आपली चळवळ अधिक तीव्र केली. कारण ईश्वराने पाठविलेले धैर्यवान प्रेषित जे समस्त विश्वासाठी हितैषी असतात आणि समस्त मानवजातीसाठी कल्याणाच्या वाटा उघडण्यासाठी असतात, ते निश्चय व संकल्पाचा एक मार्ग बंद पडताच दुसरा मार्ग काढतात.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी पाहिले की, मक्का शहराप्रमाणेच तायफ शहराची भूमीसुद्धा नापीक आहे, तेव्हा त्यांनी मक्का शहराबाहेर रस्त्यावर येऊन वाटसरूंना आपला संदेश पोहोचविण्यास सुरुवात केली. कधीकधी ते शेजारच्या एखाद्या वस्तीत जाऊन तेथील कबिल्यांच्या सरदारांपर्यंत पोहोचून इस्लामचा संदेश देत. अशा प्रकारे त्यांनी जवळपासच्या चौदा-पंधरा कबिल्यांपर्यंत सत्यधर्माचा संदेश पोहोचविला.
त्या काळात प्रेषित मुहम्मद(स) हे ‘किन्दा’ या कबिल्याच्या सरदारांना जाऊन भेटले व म्हणाले,
‘‘तुमच्या आजोबांचे नाव ‘अब्दुल्लाह’ (अर्थात एकाच ईश्वराचे दास) होते. तेव्हा तुम्हीसुद्धा एकाच ईश्वराची उपासना करून आपल्या आजोबांच्या नावाचा मान राखा आणि त्यानुसार आपले जीवन एकाच ईश्वराच्या आज्ञेस समर्पित करा!’’
‘हज’ करण्यासाठी येणार्या इतर कबिल्यांच्या लोकांनासुद्धा पूर्वीप्रमाणेच प्रेषितांनी इस्लामचा संदेश दिला.
एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी ‘आमिर बिन सअ्सआ’ या कबिल्याच्या ‘बहैरा’ सरदारास इस्लामचा संदेश दिला. ‘बहैरा’ ने प्रेषितांना विचारले,
‘‘जर मी तुमच्या संदेशाचा स्वीकार करून तुमची साथ दिली आणि तुमच्या विरोधकांवर प्रभुत्व मिळविले, तर तुमच्यानंतर इस्लामी शासनाची धुरा माझ्या हाती येईल काय?’’
‘‘ते ईश्वराच्या अख्त्यारित आहे. तो ज्यास योग्य समजेल त्यास माझा वारस बनविल!’’ प्रेषित उत्तरले. मुळात ‘बहैरा’ असे समजत होता की, इस्लाम स्वीकारण्याच्या परिणामस्वरुप प्रेषितांचे राज्य स्थापन होईल. प्रेषितांनी या ठिकाणी राजकीय सौदेबाजी नाकारली. कारण सत्यधर्मात सौदेबाजीला कोणतेच स्थान नाही.
यानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे ‘हुजैल बिन शैबान’ कबिल्यात गेले. सोबत प्रेषितांचे परममित्र माननीय अबू बकर(र) हेही होते. कबिल्याच्या लोकांनी प्रेषितांचा संदेश मनःपूर्वक ऐकला. कबिल्याचा सरदार मफरुक म्हणाला,
‘‘आपला मूळ संदेश काय आहे?’’
यावर प्रेषितांनी दिव्य कुरआनची ही आयत पठण केली,
‘‘ईश्वर एकमेव उपास्य असून मी त्याने पाठविलेला प्रेषित आहे!’’ ही दिव्य कुरआनची ‘सूरह-ए-अनआम’ची आयत क्र. १५२ आहे. ‘मफरुक’च्या सोबत ‘मुसन्ना’ आणि ‘हानी’ हे सरदारदेखील होते. सर्वांनी प्रेषितवाणीची प्रशंसा करताना म्हटले, ‘‘ही वाणी तर अत्यंत मनाला हेलावून ठेवणारी आहे. परंतु आपली धारणा आणि श्रद्धा अचानक बदलणे म्हणजेच आमच्या पारंपरिक धर्माला सोडण्यासारखे होईल. हे आमच्यासाठी कठीण आहे. शिवाय ‘ईराण’चा सम्राट ‘किसरा’शी आमचा समझोता आहे की आम्ही त्यांच्याशिवाय कोणाच्याच प्रभावाधीन राहणार नाही.’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्यांची स्पष्टोक्ती खूप पसंत केली आणि म्हणाले,
‘‘असो! आपल्या धर्माचे रक्षण ईश्वर स्वतःच करेल!!’’
इतक्या कबिल्यांना प्रेषित मुहम्मद(स) यांनी इस्लामचा संदेश दिला, परंतु त्या कबिल्यांचे दुदैवच! त्यांच्यापैकी एकानेही इस्लामचा स्वीकार केला नाही. एकार्थाने प्रत्येक प्रयत्न विफल होत गेले. एवढे असूनही प्रेषितांनी कधीच आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नाही.
अत्याचारांनी आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडल्या आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही मानवसमाजाच्या शेतीत सत्यधर्माच्या संदेशाचे बी पेरूनही ते उगत नव्हते, तेव्हा याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, आता मात्र एखादी प्रचंड मोठी घटना घडणार आहे.
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *