बंधुनो, सध्या या जगात केवळ मुस्लिमच ते भाग्यवान आहेत ज्यांच्याजवळ अल्लाहची वाणी अगदी सुरक्षित, सर्व प्रकारच्या फेरफारापासून मुक्त, अगदी त्याच शब्दांत उपस्थित आहे ज्या शब्दांत ती अल्लाहचे अंतिम प्रेषित (मुहम्मद स.) यांच्यावर उतरली होती. असे असूनदेखील या वेळी जगात मुस्लिमच ते दुर्दैवी लोक आहेत जे स्वत:जवळ अल्लाहची वाणी बाळगतात आणि तरीसुद्धा तिच्या समृद्धी व असीम आणि असंख्य देणग्यांपासून वंचित आहेत. पवित्र कुरआन त्यांच्याकडे अशासाठी पाठविला गेला होता की त्याचे पठण करावे, समजून घ्यावे, त्यानुसार कृती करावी आणि त्याच्या आधारे अल्लाहच्या पृथ्वीवर अल्लाहच्या कायद्यानुसार राज्य स्थापित केले जावे. तो त्यांना सन्मान व शक्ती प्रदान करण्यासाठी आला होता. तो त्यांना पृथ्वीवर अल्लाहचा उत्तराधिकारी बनविण्यासाठी आला होता. इतिहास साक्ष आहे की जेव्हा त्यांनी त्याच्या आदेशानुसार कृती केली तेव्हा त्याने त्यांना जगाचा मार्गदर्शक व प्रमुखसुद्धा बनवून दाखविले. परंतु आता त्यांच्या दृष्टीने कुरआनची उपयुक्तता याशिवाय काही उरली नाही की घरात त्याला ठेवून भूत-पिशाच्यांना पळवून लावावे, त्याच्या आयती लिहून गळ्यात बांधाव्यात आणि घोळून प्यावे आणि केवळ पुण्यप्राप्तीसाठी काहीही आकलन न होता त्याचे पठण केले जावे.
आता हे कुरआनकडे आपल्या जीवनाच्या प्रश्नावर मार्गदर्शनाची याचना करीत नाहीत. त्याच्याकडे विचारणा करीत नाहीत की, आमच्या श्रद्धा काय असाव्यात? आमची कर्मे काय असावीत? आमची चारित्र्ये कशी असावीत? आम्ही देवाण-घेवाण कशाप्रकारे करावी? मैत्री व शत्रुत्वात कोणत्या नियमांचे पालन करावे? अल्लाहच्या दासांचे व आमच्या स्वत:चे आमच्यावर कोणते हक्क आहेत व आम्ही ते कोणत्या प्रकारे द्यावेत?आमच्यासाठी सत्य काय आहे व असत्य काय? आम्हाला कोणाच्या आज्ञेचे पालन करावयास हवे आणि कोणाची अवज्ञा? कोणाशी संबंध ठेवावा आणि कोणाशी ठेवू नये? आमचा कोण मित्र व कोण शत्रु? आमचा विचार करता आमची प्रतिष्ठा, कल्याण व लाभ कोणत्या गोष्टीत आहे आणि अपमान व अपयश कोणत्या गोष्टीत आहे?
या सर्व गोष्टींची विचारणा पवित्र कुरआनकडे करण्याचे मुस्लिमांनी सोडून दिले आहे. आता हे नास्तिक व अनेकेश्वरवाद्याना, मार्गभ्रष्ट व स्वार्थी लोकांना व स्वत: आपल्या मनातील शैतानाला या गोष्टी विचारतात आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार वागतात. म्हणून अल्लाहला सोडून दुसऱ्यांच्या आज्ञेप्रमाणे वागण्याचे जे परिणाम व्हावयास हवे होते तेच झाले. आणि तेच परिणाम आज हे हिंदुस्तानमध्ये, चीन व जावामध्ये, पलेस्टाईन व सीरियात, अल्जीरिया व मोरोक्कोमध्ये, सर्व ठिकाणी अत्यंत वाईटप्रकारे भोगत आहेत.
पवित्र कुरआन तर मांगल्याचा स्रोत आहे. जितक्या व जशा मांगल्याची मागणी तुम्ही त्याच्याकडून कराल हा तुम्हाला देईल. तुम्ही याच्याकडे केवळ भूत पिशाच्चांना पळविणे व खोकला आणि तापाचा इलाज व खटल्यात यश व नोकरीची प्राप्ती आणि अशाच प्रकारच्या तुच्छ व हलक्या गोष्टींची मागणी कराल तर त्याच तुम्हाला मिळतील. जगातील बादशाही व पृथ्वीतलाच्या राज्याची मागणी कराल तर तीसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल, आणि तुमची सर्वांत उंच आठव्या स्वर्गापर्यंत पोहचण्याची मनोकामना असेल तर हा तुम्हाला तेथपर्यंतसुद्धा पोहचवील. ही तर तुमच्या बुद्धीची दिवाळखोरी आहे की तुम्ही समुद्राकडे दोन थेंबांची मागणी करता, नाहीतर समुद्र तुम्हाला नदीच प्रदान करण्यास तयार आहे.
सज्जनहो, आमचे मुस्लिम बंधु हसून हसून अल्लाहच्या पवित्र ग्रंथावर जे अत्याचार करत आहेत ते इतके निंदनीय आहेत की स्वत: यानीच जर एखाद्या व्यक्तीला असले चाळे करताना पाहिले तर त्याची टिंगल उडवतील. एवढेच नव्हे तर त्याला वेडा ठरवतील.
तुम्हीच सांगा, एखाद्या माणसाने ‘प्रिस्क्रीप्शन’ म्हणजे औषधाची चिठ्ठी डॉक्टरकडून लिहून आणली आणि चिठ्ठीला कापडात गुंडाळून स्वत:च्या गळ्यात बांधले अथवा ती चिठ्ठी पाण्यात कोळून प्याला तर तुम्ही त्याला काय म्हणाल? तुम्हाला त्याच्या कृत्यावर हसू येईल की नाही? आणि तुम्ही त्याला मूर्ख समजणार नाही का? परंतु सर्वांत महान डॉक्टराने तुमच्या रोगावर उपचार व कृपेचे जे अनुपम ‘प्रिस्क्रीप्शन’ (औषध योजना) लिहून दिले आहे, त्याच्याशी तुमच्या डोळ्यांदेखत असा दुव्र्यवहार होत आहे!आणि कोणालाही त्याची खंत नाही? कोणीही विचार करीत नाही की औषध-योजनेची चिठ्ठी गळ्यात अडकविण्याची अथवा कोळून पिण्याची वस्तु नव्हे, तर ती अशासाठी असते की तिच्यात दिलेल्या सूचनेनुसार औषधाचा प्रयोग केला जावा.
0 Comments