Home A प्रेषित A आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे स्थलांतर

आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे स्थलांतर

इस्लामी प्रचारकांच्या आंदोलकांसाठी मक्का शहरातील अन्यायपूर्ण वातावरण अत्यंत प्रतिकूल आणि जीवघेणे झाले होते. अत्याचारांची सीमा पार झाली होती. तर दुसरीकडे ‘मदीना’ शहरात इस्लामी आंदोलनासाठी वातावरण अतिशय अनुकूल झाले होते. यामुळे प्रेषित मुहम्मद (स.) यांचा उत्साह वाढत होता. प्रेषितांनी आपले सोबती मदीनेस पाठविले. आता केवळ माननीय अबू बकर(र) आणि अली(र) हे दोघेच मक्का शहरात राहिले.
सत्यधर्माच्या आंदोलनाचे विरोधक अत्यंत चितातूर होते. कारण इस्लामी प्रचाराचे अंकुर आता एका मोठ्या वृक्षात रुपांतरित झाले होते. त्यांच्यासमोर एकेश्वरवादाच्या स्त्रोतामुळे आलेल्या परिवर्तनाचे एक मोठे वादळ उभे होते. आता मात्र त्यांना कळून चुकले की, या वादळामुळे त्यांची अमानुष आणि अनेकेश्वरी व्यवस्था, त्यांचे पद व हुद्दे आणि अज्ञानावर आधारित कर्मकांड प्रथा, हे सर्वकाही नष्ट होणार आहे. या संकटाची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी एके दिवशी मक्काच्या सर्व सरदारांनी ‘दारुल नदवा’ या सार्वजनिक हॉलमध्ये परिषद बोलाविली. चर्चा होत गेली. प्रेषितांचे आंदोलन चिरडण्यासाठी नवनवीन प्रस्ताव समोर येऊ लागले. परंतु इस्लामचा अतिशय कट्टर विरोधक असलेल्या ‘अबू जहल’ याने एक जबरदस्त योजना सादर केली.
ती योजना अशी होती की, प्रत्येक कबिल्याच्या एक एक प्रतिष्ठित तरूणाने शस्त्र घेऊन पुढे यावे. प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर सर्वच सशस्त्र तरुणांनी एकत्रितपणे हल्ला चढवून त्यांचा वध करावा. या हत्येची जवाबदारी कोणा एका कबिल्यावर न येता सर्वच कबिल्यांवर येईल आणि या सर्व कबिल्यांशी प्रेषितांच्या परिवाराची टक्कर घेण्याची हिम्मत होणार नाही.
हा प्रस्ताव इतका जबरदस्त होता की, परिषदेतील सर्वच सरदारांनी याचे समर्थन केले. इकडे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना ‘मक्का’ शहर त्यागण्याचा ईश्वरी आदेश झाला. वैर्याची रहस्यमय रात्र येऊन ठेपली. ती प्रेषितत्वाच्या तेराव्या वर्षाची ‘सफर’ महिन्याची शुक्रवारची सत्तावीस तारीख होती. इकडे प्रेषितांनी आपले विश्वासू सोबती माननीय अली(र) यांना बोलावून सांगितले की, ‘‘मला ‘हिजरत’ ची (अर्थात स्थलांतर करण्याची) ईश्वरी आज्ञा झाली आहे. त्यामुळे आज रात्री मी आपल्या घरी झोपणार नाही. माझ्या जागी तुम्ही झोपावे. लोकांच्या ज्या अनामती माझ्याकडे आहेत त्या तुम्ही सकाळ होताच त्यांच्या त्यांना परत कराव्यात.’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या स्वच्छ चारित्र्याचे हे दर्शन होय. या अनामती सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने लोकांनी त्यांच्याकडे ठेवल्या होत्या. या लोकांमध्ये विरोधकसुद्धा होते. परंतु प्रेषितांनी विरोधकांच्या अनामतीसुद्धा जशास तशा परत केल्या. मग ते सरळ माननीय अबू बकर(र) यांच्या घरी आले. त्यांना ‘हिजरत’चा पूर्ण कार्यक्रम समजावून सांगितला. माननीय अबू बकर(र) यांनी सुरुवातीलाच या कार्यपूर्तीस्तव दोन सांडण्या तयार ठेवल्या होत्या. माननीय अबू बकर(र) यांनी एक सांडणी प्रेषितांना सादर केली, परंतु प्रेषितांनी आग्रह करून सांडणीची किमत त्यांना दिली. माननीय अबू बकर(र) यांच्या कन्या माननीय अस्मा(र) यांनी ताबडतोब एका कपड्यात खाण्याच्या वस्तू बांधून दिल्या. एक कापड पाण्याच्या मटक्यास बांधले.
नियोजित वेळेवर प्रेषित मुहम्मद(स) आपले सहकारी मा. अबू बकर(र) यांना घेऊन रात्रीच्या अंधारात ‘मदीना’च्या प्रवासावर निघाले. मक्का शहर त्यागतेवेळेस प्रेषितांच्या भावना ‘हेलावल्या’, त्या त्यांच्या मुखावर अशा रितीने प्रकटल्या,
‘‘ईश्वराची शपथ! ही भूमी ईश्वराची सर्वांत जास्त प्रिय भूमी आहे. मला ही भूमी त्याग करण्यावर विवश न केले गेले असते तर मी कधीच हिचा त्याग केला नसता!’’
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आपले जीवाभावाचे मित्र माननीय अबू बकर(र) यांच्यासोबत ‘सौर’ नावाच्या गुहेत पोहोचले. इकडे माननीय अली(र) हे प्रेषितांच्या बिछान्यावर चादर तानून निश्चित झोपले होते. विरोधक कुरैशांनी त्यांच्या निवासस्थानाचा घेराव केलेला होता. पूर्ण शहराची नाकेबंदी केली होती. रात्र संपत आली आणि विरोधक प्रेषितांच्या निवासस्थावर पोहोचले. घरात घुसून प्रेषितांच्या बिछान्यावर माननीय अली(र) यांना पाहताच त्यांची तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. त्यांची पूर्ण योजना धुळीस मिळाल्याचा त्यांना भयंकर संताप चढला. प्रेषित त्यांच्या हातून निसटले होते. त्यांनी प्रेषितांचा पाठलाग करण्यासाठी चोहीकडे सशस्त्र माणसे पिटाळली. पाठलाग करणारे प्रेषितांनी आश्रय घेतलेल्या ‘सौर’ गुहेपर्यंत पोहोचले. आत प्रेषितांचे सोबती माननीय अबू बकर(र) हे चिताग्रस्त झाले. त्यांना वाटले की, शत्रू गुहेत शिरले तर अनर्थ होईल. पूर्ण इतिहासाची दिशाच बदलून जाईल. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना ईश्वराची विशेष सूचना प्राप्त होती. त्यांनी आपले सोबती माननीय अबू बकर(र) यांचे सांत्वन करताना म्हटले, ‘चिता करु नका, ईश्वराची मदत आपल्याबरोबर आहे.’ हे शब्द ऐकताच माननीय अबू बकर(र) यांच्या मनातली संपूर्ण भीती पार नाहीशी झाली. शत्रूने गुहेजवळ येऊन पाहिले. गुहेचे द्वार छोटे असल्याने त्यांना वाटले की, एवढ्या छोट्याशा द्वारातून कदाचित दोन माणसे आत जाऊ शकणार नाहीत. तेथून ते परत फिरले. प्रेषित मुहम्मद(स) आणि माननीय अबू बकर(र) यांनी तीन दिवस गुहेतच राहून काढले. माननीय अबू बकर(र) यांचे सुपुत्र अब्दुल्लाह(र) हे रात्रीच्या अंधारात येऊन मक्का शहरातील शत्रूंच्या हलचालीबद्दल प्रेषितांना पूर्णपणे खबर पोहोचवित असत. तसेच माननीय अबू बकर(र) यांचा नोकर आमिर हा शेळ्यांचा कळप घेऊन अंधार्या रात्री गुहेत येऊन त्यांना दूध पोहोचवित. शेळ्यांच्या चालण्याने मानवी पदचिन्हेसुद्धा मिटून जात असत आणि शत्रूला मानवी पायखुणा न दिसल्याने त्यांना वस्तुस्थितीचा अनुमान लावता येत नसे.
तीन दिवसांनंतर ‘अब्दुल्लाह बिन उरैकत’ हा निश्चित ठरलेल्या समयी ‘सौर’ गुहेत पोहोचला. त्याला वाळवंटातील आणि पर्वतातील रस्त्यांचे उत्तम ज्ञान असल्याने प्रेषितांनी त्यास ‘गाईड’ म्हणून अगोदरच नेमले होते. अशा प्रकारे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स), माननीय अबू बकर(र), अब्दुल्लाह बिन उरैकत आणि आमिर बिन कुहैरा या चौघांचा काफिला ‘रब्बिउल अव्वल’ महिन्याच्या एक तारखेस ‘मदीना’कडे रवाना झाला.
इकडे मक्का शहरात विरोधकांचा वैफल्याने अक्षरशः जळफळाट होत होता. त्यांनी मक्का शहरात दवंडी दिली की, ‘‘जो माणूस प्रेषित मुहम्मद(स) आणि अबू बकर(र) यांना जीवित अथवा मृत अवस्थेत आणून देईल त्यास शंभर उंट बक्षीस देण्यात येतील.’’ ही दवंडी ऐकताच मक्का शहरातील एक पटाईत घोडेस्वार ‘सुराका बिन मालिक’ नावाचा तापट तरूण आपला घोडा घेऊन प्रेषितांच्या मागावर लागला. तो पाठलाग करीत प्रेषितांच्या जवळ पोहोचला. परंतु अचानक त्याचा घोडा ठेचाळला. त्याने परत प्रेषितांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच परत त्याचा घोडा ठेचाळला आणि तोही घोड्यावरून कोसळला. तिसर्यांदा परत असेच घडले आणि त्याचे आंतरमन जागे झाले. त्याला वाटू लागले की, आदरणीय मुहम्मद(स) हे खरोखरच ईश्वराचे प्रेषित असल्याने त्यांच्यावर हात घालणे अशक्य आहे. त्याने प्रेषितांची माफी मागितली आणि प्रेषितांनी त्याच्या विनंतीवरून त्यास अभयपत्र लिहून दिले. प्रेषितांनी त्यास आज्ञा दिली की, ‘‘माझा पाठलाग करणार्यास परत पाठवा.’’ त्याने परत निघून पाठलाग करणार्या शत्रूंना सांगितले की, ‘‘मी या मार्गावर प्रेषितांना पाहिलेच नाही.’’ शत्रू ‘सुराका’ च्या शब्दांचा विश्वास करून परत फिरले.
या प्रवासामध्ये प्रेषितांचा हा काफिला ‘खुजाआ’ या कबिल्याच्या ठिकाणी पोहोचला. प्रेषितांनी त्यांना खाणपानाच्या वस्तूंबाबत विचारले, परंतु त्यांनी सांगितले, ‘‘हे प्रेषित! ईश्वराची शपथ! आमच्या घरी खाण्यापिण्याची काही जरी वस्तु असती तर आम्ही आपणास निश्चितच दिली असती. त्या ठिकाणी एक अटलेली शेळी होती. प्रेषितांनी तिचे दूध काढण्याची परवानगी घेतली आणि इतके दूध काढले की, प्रेषितांच्या सोबत्यांबरोबरच ‘उम्मे माअबद’च्या सर्व परिवारजणांनी पोटभरून दूध पिले. परत आणखीन दूध काढले आणि ‘उम्मे माअबद’ यांना दिले. ‘उम्मे माअबद’ यांचे पती आपल्या शेळ्या घेऊन संध्याकाळी घरी परतले, तेव्हा पत्नीने संपूर्ण वृत्तान्त पतीस सांगितला.
पत्नीच्या तोंडून संपूर्ण वृत्तान्त ऐकल्यावर पतीला कळून चुकले हा माणूस नक्कीच ईश्वराचा प्रेषित आहे. अटलेल्या शेळीच्या स्तनातून दूध निघणे म्हणजे प्रेषितांवर झालेली दैवी कृपाच होय.
प्रेषितांच्या प्रवासामध्ये रस्त्यात त्यांना माननीय जुबैर(र) ‘सीरिया’कडून व्यापारी दौरा आटोपून येताना भेटले. त्यांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) आणि माननीय अबू बकर(र) यांना पांढरे वस्त्र भेट म्हणून सादर केले. आदरणीय प्रेषितांना ठार करण्यासाठी ‘बुरैदा अस्लमी’ आपल्या सत्तर सहकार्यांसह शस्त्रे घेऊन आले. त्यांनी प्रेषितांशी लढण्यापूर्वी त्यांच्याशी संवाद साधला. प्रेषितांनी त्यांना दिव्य कुरआनातून ईश्वरी संदेश दिला. या संदेशामुळे ‘बुरैदा अस्लमी’ आणि त्यांचे सत्तर सशस्त्र सहकारी इतके प्रभावित झाले की, या सर्वांनी याच ठिकाणी इस्लामची दीक्षा घेतली. आपल्या चुकीच्या निर्णयाचा त्यांना भयंकर पश्चात्ताप झाला. दयाळू प्रेषितांनी त्यांचे सांत्वन केले. माननीय बुरैदा अस्लमी यांनी इच्छा व्यक्त केली की, आपल्या या ‘हिजरत’ (स्थलांतर) च्या मंगल प्रवासामध्ये आपल्या पुढे एक झेंडा असावयास हवा. आदरणीय प्रेषितांनी त्यांच्या विनंतीस मान देऊन आपली पगडी काढली व त्यांच्या भाल्यास बांधून झेंडा तयार केला व तो ‘बुरैदा अस्लमी’ यांच्या हाती दिला. माननीय बुरैदा अस्लमी(र) हे झेंडा घेऊन पुढे चालत होते आणि हा काफिला ईश्वर महिमत्वाचे नारे लावत चालत होता.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या ‘मदीना’ स्थलांतराची शुभवार्ता मदीना शहरात पोहोचली. मदीनावासी प्रेषितांची अत्यंत आतुरतेने वाट पाहू लागले. प्रेषित मदीना शहराच्या जवळ येताच एका ‘ज्यू’ माणसाने त्यांना किल्ल्यावरून पाहिले आणि सर्व मदीनावासीयांना आवाहन करून सांगितले की, ‘मदीनावासीयांनो! तुम्ही ज्या सद्गृहस्थांची आतुरतेने वाट पाहात होता, ते येऊन पोहोचले आहेत.’’
‘रब्बिउल अव्वल’ महिन्याची ही आठ तारीख होती. अन्सारां (मदीनावासी) मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी आपापली हत्यारे उंचावून प्रेषितांच्या आगमनाचा जल्लोष साजरा केला. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे काही दिवस मदीना शहराबाहेरील ‘कुबा’ या वस्तीत तेथील सरदार ‘कुलसुम बिन हिजम’ यांच्या निवासस्थानी थांबले. तेवढ्यात माननीय अली(र) हेसुद्धा प्रेषितांच्या सूचनेनुसार लोकांच्या अनामती परत करून प्रेषितांना येऊन भेटले. ‘अन्सार’ (मदिनावासी) प्रेषित आणि त्यांच्या सोबत्यांना गटागटाने येऊन भेटू लागले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी या ठिकाणी पहिल्या मस्जिदीचा पाया रोवला. बांधकामामध्ये प्रेषितांनी जातीने कष्ट घेतले. याच ठिकाणी त्यांनी ‘जुमा’ (शुक्रवार) ची नमाज अदा केली आणि अत्यंत प्रभावी खुतबा (भाषण) दिला.
‘कुबा’ या ठिकाणी चौदा दिवस व्यतीत करून ‘जुमा’ची नमाज आटोपून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) मदीनाकडे रवाना झाले. प्रत्येक ठिकाणी प्रेषितांचे जल्लोषपूर्ण स्वागत होत होते.
मदीना शहरातील प्रत्येक मुस्लिम प्रेषितांच्या सांडणीची लगाम धरून आपल्या घरी घेऊन जाऊन पाहुणाचार करू इच्छित होता. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) म्हणाले, ‘‘सांडणीस सोडून द्या. ही ईश्वराकडून नियुक्त करण्यात आली आहे. ही स्वतःहून ज्याच्या दारासमोर उभी राहील, त्याचा पाहुणचार मी स्वीकार करेन!’’ चालता चालता त्यांची सांडणी ‘माननीय अबू अय्यूब अन्सारी(र)’ यांच्या घरासमोर बसली. अशा रितीने प्रेषितांच्या पाहुणचाराची शुभसंधी त्यांना मिळाली.
या प्रसंगापासून इस्लामी इतिहासातील न्याय आणि दयाभावाच्या नवीन अध्यायाची सुरुवात झाली. संघर्षाच्या एका नवीन पर्वाची आणि त्याचबरोबर उत्कर्षाच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली.
संबंधित पोस्ट
July 2024 Zul Hijjah 1445
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
1 24
2 25
3 26
4 27
5 28
6 29
7 Muharram 1
8 2
9 3
10 4
11 5
12 6
13 7
14 8
15 9
16 10
17 11
18 12
19 13
20 14
21 15
22 16
23 17
24 18
25 19
26 20
27 21
28 22
29 23
30 24
31 25
1 26
2 27
3 28
4 29

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *